रत्नागिरीतील आशादीप संस्था मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळवण्याचे कार्य गेल्या १५ वर्षांपासून करत आहे. दिवाळीच्या निमित्ताने, या संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारा, संस्थेचे संस्थापक दिलीप रेडकर यांनी लिहिलेला हा लेख... ........
मतिमंद मुलांना समाजात पाहिजे तेवढे स्थान मिळत नाही. आई-वडील म्हातारे होत जातात. भावंडांना आपापले व्याप असतात. मग या मुलांचे संगोपन करायचे कोणी? प्रत्येक आई-वडिलांना आपले मूल प्रियच असते. माझा स्वतःचा मुलगा मतिमंद आहे. या मुलाचे काय होणार, या विचाराने मी हवालदिल झालो होतो; मात्र मी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्याच समदु:खी पालकांचा मी ग्रुप तयार केला आणि मतिमंद मुलांच्या आयुष्यात आशेचे दीप उजळणारी ‘आशादीप’ ही संस्था रत्नागिरीत उभी राहिली.
संस्थेत सर्व सण अगदी गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. मुलांना घरची आठवण येऊ नये किंवा त्यांच्या सेवेत काही कमी पडू नये, यासाठी संस्थेतील ११ कर्मचारी अविरत प्रयत्न करत असतात. सेवाभावी वृत्तीचे हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करतात.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा सर्वत्र करोना थैमान घालत आहे; पण याही परिस्थितीत मुलांची एवढी काळजी घेतली गेली, की लॉकडाउनच्या सात महिन्यांत एकाही मुलाला कोणतेही आजारपण आले नाही. जे-जे खबरदारीचे उपाय योजले पाहिजेत, ते सर्व पाळून संस्थेतील २७ मुलांना आम्ही अगदी सुरक्षित व सुखरूप ठेवले आहे.
मुलांना काही तरी काम मिळावे या उद्देशाने संस्थेने छोटे स्वयंरोजगार केंद्रही सुरू केले आहे. त्यामुळे मुले काम करतात आणि त्याचा मोबदला त्यांच्या नावे बँकेत जमा केला जातो. वर्तमानपत्रांपासून पेपर बॅग, कागदी फुले, हिराचे झाडू, पणत्या, उटणे तयार करणे इत्यादी उपक्रम मुलांमार्फत करून घेतले जातात.
इथल्या मुलांना दिवाळीच्या दिवशी सुवासिक तेल, उटणे लावून अंघोळ घातली जाते. फराळ दिला जातो. मुले फटाकेही फोडतात; पण हे सर्व करताना त्यांना काही इजा होणार नाही, याचीही काळजी घेतली जाते.
आशादीप संस्था विनाअनुदानित तत्त्वावर काम करते. कोणतेही शासकीय अनुदान संस्थेला मिळत नाही. सध्या जगभर करोना या आजाराने थैमान घातले आहे. सर्वच जण आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. परंतु अशाही परिस्थितीत सामाजिक जाणिवेचे भान असणारे मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत.
समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व संस्था पुढे येऊन संस्थेला मदतीचा हात देत असल्यामुळेच संस्थेचे काम अविरतपणे सुरू आहे. यात प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो कै. आशुतोष मुळे यांचा. त्यांच्या सहकार्यामुळेच फिनोलेक्स कंपनी गेली चार वर्षे संस्थेला दरमहा लागणारा बराचसा जिन्नस देत आहे.
‘आ. सा. मि. सा.’ (आपण सारे मिळून सांभाळू) अशी दत्तक पालक योजनाही संस्थेने सुरू केली आहे. तिलाही समाजाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक जण आपले वाढदिवस घरी साजरे न करता संस्थेतील मुलांबरोबर साजरे करण्यासाठी येथे येतात.
संस्थेची इमारत जुनी झाली आहे व आता नवीन इमारत बांधून मुलांना अधिक सुखसोयी देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी निधी संकलनाचे कार्यही सुरू आहे. कोणी आपले किंवा आपल्या नातेवाईकांचे नाव एखाद्या कक्षास देऊ इच्छित असल्यास तशी व्यवस्थाही केली जाईल. भविष्यात कोकणातील कोणीही मतिमंद व्यक्ती केवळ पैशांअभावी अशा सेवेपासून वंचित राहू नये म्हणून अशा निराधार मतिमंद व्यक्तींना आधार देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. कोणी सुदृढ, निराधार गरजू व्यक्ती असेल आणि सेवाभावी वृत्तीने काम करण्याची तयारी असेल, अशा व्यक्तींनाही संस्थेत आधार दिला जाईल.
आजारी आणि गरजू व्यक्तींना हवी असणारी वैद्यकीय उपकरणे संस्थेतर्फे अल्पशा भाड्याने दिली जातात, जेणेकरून त्यांचा आजारपणात होणारा खर्च थोडा तरी कमी होण्यास मदत मिळेल.
१५ वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आता एका डेरेदार वृक्षात रूपांतरित होत आहे. २०१६ साली शासनाच्या कोकण भूषण पुरस्काराने संस्थेचा गौरव झाला. आपणही आपला मौल्यवान वेळ देऊन संस्थेच्या कामाची पाहणी करून आपले मार्गदर्शन देऊ शकता. आपल्या सूचना या संस्थेच्या प्रगतीसाठी नक्कीच सहायक ठरतील.
- दिलीप रा. रेडकर
मोबाइल : ९४२२६ ३१४१७, ८४५९३ ४८९५३
संस्थेचा पत्ता :
आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ (नोंदणीकृत)
ई-६७, एमआयडीसी, रत्नागिरी
ई-मेल : ashadeep.ratnagiri@gmail.com